"छत्रपती शिवाजी महाविद्यालयामध्ये कवीसंमेलन संपन्न" - kalayog

२८ फेब्रुवारी, २०२२

"छत्रपती शिवाजी महाविद्यालयामध्ये कवीसंमेलन संपन्न"


कळंब येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयामध्ये मराठी भाषा गौरव दिनानिमित्त २७ फेब्रुवारी २०२२रोजी आजी आणि माझी विद्यार्थ्यांचे कवी संमेलन महाविद्यालयातील मराठी विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आले होते.या कवी संमेलनामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला ,त्यांनी आपल्या स्वरचित  कवितांचे सादरीकरण केले. या कवितांमध्ये ओम भुईटे यांनी 'जीवन जगताना' ही कविता सादर करून रसिक श्रोत्यांची मने जिंकली.तर कु.वैष्णवी कलढोण यांनी 'मुलगी 'नावाची कविता सादर करून समाजामध्ये मुलीला कसे दुय्यम स्थान मिळते ही वेदना काव्यातून मांडली.  कु. गायकवाड सानिका या विद्यार्थीनींने 'माणूस शोधत आहे' या कवितेमधून  माणसांमध्ये माणूसपण राहिले नाही ही खंत व्यक्त केली. कु.भराटे वैष्णवी यांनी  'तुला सुद्धा माझी आई व्हावं लागेल' नावाची कविता सादर करून रसिकांची  टाळ्या घेऊन दाद मिळवली .कु. गोदावरी कदम यांनी 'नाते हे प्रेमाचे' या शीर्षकाची कविता सादर करून रसिकांची मने जिंकली. त्याचप्रमाणे सुषमा शेळके यांनी 'राजकारण' नावाची कविता सादर करून राजकारणा संदर्भातील आपल्या भावना विशद केल्या. तसेच महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी काटे यांनीही मराठी भाषेच्या संदर्भातील कविता सादर केली.या कवी संमेलनामध्ये महाविद्यालयाचे प्रा.शफिक चौधरी व प्रा. सोमनाथ कसबे  यांनीही आपल्या कवितांचं सादरीकरण केलं .कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य शशिकांत जाधवर  हे होते.या कार्यक्रमाचे नियोजन आणि संयोजन महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. हनुमंत माने यांनी केले मराठी भाषा गौरव  दिनानिमित्त आयोजित केलेल्या या कवी संमेलनाचे सूत्रसंचालन  प्रा. डॉ.हनुमंत माने यांनी तर आभार प्रा.सोमनाथ कसबे यांनी मानले.