जागतिक महामारी कोरोना या महाभयंकर संकटाने अवतीभवतीच्या गावात थैमान घातलेले असताना देखील कळंब तालुक्यातील भोगजी गावाने या आपत्तीला आजपर्यंत गावात शिरकाव करण्यापासून रोखण्यासाठी निकराचा लढा दिला आहे.
शासनाने दिलेल्या सूचनांचे वेळोवेळी पालन करत तोंडाला मास्क वेळोवेळी हात धुणे व एकमेकांपासून दूरचे अंतर सांभाळून आपापल्या कामांमध्ये व्यस्त राहिलेल्या भोगजी तील बांधवांनी आपलं संरक्षण केलं आहे. शेती व्यवसायावर अवलंबून असलेल्या या गावकऱ्यांनी आपणच आपले जबाबदार या उक्तीनुसार प्रत्येकाने योग्य ती खबरदारी घेऊन व इतरांवर लक्ष ठेवून या संकटाला तोंड दिले आहे यासाठी स्थानिक प्रशासन ग्रामपंचायत प्रशासन शाळेतील शिक्षक बांधव गावातील आरोग्य कर्मचारी सामाजिक कार्यकर्ते यांनी मेहनत घेऊन लोकांपर्यंत विविध महत्वपूर्ण माहिती पोहोचवून लोकांना जागृत केले याचाच परिणाम म्हणून आज पर्यंत गावामध्ये कोरोना ला शिरकाव करता आलेला नाही . केवळ दोन व्यक्ती त्याही बाहेरगावी असल्याच्या कारणाने गावात येण्यापूर्वीच त्यांनी स्वतःच कोविड परीक्षण करून घेतलं त्यामध्ये त्यांना सामान्य लक्षणे दिसून आल्यामुळे त्यांनी तालुक्याचे ठिकाणीच उपचार घेऊन व चाचण्या नकारात्मक आल्यावरच गावात प्रवेश केला. बाहेरगावावरून येणारा प्रत्येक जण स्वतःबरोबर इतरांची देखील काळजी घेण्यासाठी स्वतः विलगीकरण करून राहत आहेत. गावातील शिक्षक व आरोग्य कर्मचारी वेळोवेळी गावातील नागरिकांच्या भेटीगाठी करून त्यांच्या आरोग्याची चौकशी करत आहेत शासनामार्फत पुरवलेल्या गोळ्या अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या लोकांना दिल्या जात आहेत लसीकरणासाठी लोकांना जागृत केलं जात आहे त्याच बरोबर गावाचं निर्जंतुकीकरण देखील केलं जात आहे फवारणी यंत्राच्या माध्यमातून औषधांचा शिडकाव केला जात आहे. पाठी मागील काही महिन्यापूर्वी गावामध्ये सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी बाहेर गावावरून काही मतदाते आलेले होते परंतु त्यांनीदेखील कोणाच्याही घरी प्रवेश न करता शासकीय नियमांचे पालन करत मतदान करून आपापल्या कामाच्या गावी परतले या त्यांनी घेतलेल्या काळजीमुळे गावात कोणालाही कोरोना संक्रमण झाले नाही याचबरोबर अत्यावश्यक सेवा पुरवठा करणारे सर्व घटक यांनी शासनाच्या सूचनेचे तंतोतंत पालन केले आहे. विवाह कार्य असो अथवा दुःखद प्रसंग मोजक्याच व्यक्तीने पार पाडले जातात पोलीस प्रशासनाकडून देखील वेळोवेळी सुरक्षेसंबंधी सूचना व व मार्गदर्शन केले आहे. लवकरच या संकटातून बाहेर पडू अशी अपेक्षा आहे. परंतु सर्वांनी शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे तरच आपण सर्व जण सुरक्षित राहू गाफील राहून चालणार नाही अशी ग्रामस्थांची भावना आहे.
पद्मावती देवी या ग्रामदैवतावर असलेला गावकऱ्यांचा विश्वास व शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन केल्यामुळेच आजपर्यंत भोगजी हे गाव सुरक्षित राहिले असल्याची स्थानिकांमध्ये चर्चा आहे.